जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) :- “समग्र शिक्षा शिक्षण विभाग” अंतर्गत जळगाव तालुक्यातील १०७ शाळांचे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांना शालेय सुरक्षा आणि सुरक्षितता प्रशिक्षण देण्यात आले. राज्यात बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमन २००९ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्याना सुरक्षित वातावरणात गुणवत्तापूर्वक शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून शाळा आणि परत घरापर्यंत सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, विद्यार्थ्यांवरील हिंसाचार, शाळा सुरक्षा, आपत्ती जोखीम कमी करणे, बाल संरक्षण, आरोग्य आणि स्वछता या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई संचालक आर. विमला यांच्या सूचनेप्रमाणे व प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.गट शिक्षणाधिकारी सरला पाटील, शा. पो. आ. अधीक्षक विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख ,अनिल सोनार, प्रा. रफिक शेख यांची उपस्थिती होती. स्किल ट्री संस्थेचे जिल्हा समन्वयक तेजश्री जेऊरकर, भूषण शिरसाठ, राजेश पाटील, स्मिता शेंडगे यांच्या समन्वयाने हे प्रशिक्षण राबविण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी जळगाव तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख उपस्थित होते.