जळगाव तालुक्यात तरसोद येथे शेतातच घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- कर्जाचा डोंगर कसा फेडायचा, या विवंचनेत असलेल्या जळगाव तालुक्यातील तरसोद येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने शेतातच विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. अशोक रुपसिंग राजपूत असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव असून, शनिवारी दि. १४ फेब्रुवारी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक रुपसिंग राजपूत (वय ५५, रा. तरसोद, ता. जळगाव) हे शनिवारी पहाटेच्या सुमारास आपल्या शेतात गेले होते. तिथेच त्यांनी नैराश्यातून विषारी औषध प्राशन केले. सकाळी कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली. त्यांना तातडीने दुपारी १ वाजेच्या सुमारास जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले.(केसीएन)मात्र, विषारी औषधाचा परिणाम संपूर्ण शरीरात पसरल्याने त्यांची प्रकृती कमालीची खालावली होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले आहे.
अशोक राजपूत यांच्यावर सोसायटीचे कर्ज होते. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने आणि कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेत ते गेल्या काही दिवसांपासून वावरत होते. याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयत अशोक राजपूत यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाने अशा प्रकारे जीवन संपविल्यामुळे तरसोद गावावर शोककळा पसरली आहे.









