उद्या १५ फेब्रुवारीपासून पंधरा दिवसीय यात्रेला प्रारंभ
त्रिवेणी संगमावरील पुरातन त्रिपिंडी महादेवाचा जागर ; भाविकांसाठी विशेष बस सेवा
अमळनेर (प्रतिनिधी)- पाडळसरे जवळील धुळे व जळगाव जिल्ह्याच्या सरहद्दीवर वसलेले आणि खान्देशची ‘काशी’ म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर रविवार, १५ फेब्रुवारीपासून पंधरा दिवसीय मोठ्या यात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. निसर्गरम्य तापी, पांझरा आणि गुप्त गंगेच्या त्रिवेणी संगमावर वसलेले हे पुरातन, जागृत आणि नवसाला पावणारे स्वयंभू त्रिपिंडी महादेवाचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व
स्कंद पुराण, शिवपुराण आणि तापी महात्म्य यांसारख्या ग्रंथांमध्ये या तीर्थक्षेत्राचा उल्लेख आढळतो. वनवासात असताना पांडवांनी या ठिकाणी दर्शन घेतल्याची आख्यायिका आहे. महामंडलेश्वर स्वामी हंसानंद महाराज यांनी येथे महाराष्ट्रातील पहिले अखिल भारतीय संत संमेलन भरवल्यापासून या क्षेत्राला विशेष धार्मिक मान्यता प्राप्त झाली आहे. आजही येथे पितृशांती, तर्पण विधी आणि योगसाधनेची परंपरा अविरत सुरू आहे.
१६ व्या शतकात बांधलेले हे मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणात असून १८ खांबांवर उभा असलेला सभामंडप आणि चार घुमट हे आकर्षणाचे केंद्र आहेत. विशेष म्हणजे, सूर्याची किरणे थेट त्रिपिंडीवर पडतात, जो एक विलक्षण अनुभव असतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि १७ व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे पुरावे येथील संस्कृत व मोडी लिपीतील शिलालेखांवरून मिळतात.
मंदिर प्रशासनाने पार्किंग, भक्त निवास आणि पाणीपुरवठ्याची चोख व्यवस्था केली आहे. विश्वस्त तुकाराम चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री परिसरात रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

बस सेवा अमळनेर आगारातून दररोज सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत दर तासाला बस उपलब्ध असेल. तसेच शिंदखेडा व शिरपूर येथूनही बसची सोय करण्यात आली आहे. नदीपात्रात दुर्घटना टाळण्यासाठी स्वयंसेवक तैनात असून, मारवड व बेटावद पोलीस तसेच स्काऊट गाईड गर्दीवर नियंत्रण ठेवतील.अमळनेर येथील मत्स्यव्यवसाय मंडळाकडून भाविकांना साबुदाणा खिचडी व उपवास फराळाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
तापी आणि पांझरा नदीच्या विहंगम संगमामुळे अनेक भाविक २५ नौकांच्या माध्यमातून जलप्रवास करत दर्शनासाठी येतात. शिरपूर आणि शिंदखेडा भागातील भाविकांचा यात मोठा सहभाग असतो. या ठिकाणी खोल डोह असल्याने प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

पाडळसरे येथे जलाभिषेक व सत्यनारायण पूजन
पाडळसरे येथील द्वादश ज्योतिर्लिंगाची स्थापना असलेल्या प्राणेश्र्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त पंचनद्यांच्या पाण्याने जलाभिषेक व सत्यनारायण पूजन करण्यात येणार आहे. त्रिमूर्ती निर्वाण ट्रस्ट व संत तुकाराम महाराज भजनी मंडळाने भाविकांना दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.









