जळगाव शहरात एमआयडीसीतील कंपनीत घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कुसुंबा येथील एका २७ वर्षीय तरुणाचा कंपनीत घातक व विषारी द्रव्याच्या संपर्कात आल्याने विषबाधा होऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विश्वनाथ शांताराम सोनवणे (वय २७, रा. कुसुंबा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. विश्वनाथ सोनवणे हा कुटुंबासह कुसुंबा गावात राहत होता. शुक्रवार, २७ जून रोजी तो एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत असताना, काहीतरी विषारी द्रावणाच्या (केमिकल) संपर्कात आला. यामुळे त्याला तीव्र विषबाधा झाली. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने रात्री १० वाजता जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
विश्वनाथवर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यानच मंगळवार, १ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार सचिन पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.