मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी शिवारात आढळला होता मृतदेह
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील टाकळी शिवारात शेतजमीनीच्या जुन्या वादातून चुलतभावाने तरुणाचा अज्ञात हत्यारांनी वार करून खून केल्याची धक्कादायक घटना तपास व फिर्यादीतून समोर आली आहे. या संदर्भात शनिवारी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
सुनील रामसिंग चव्हाण (वय-३२, रा.टाकळी ता. मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. सुनील चव्हाण हा परिवारासह टाकळी गावात वास्तव्याला होता. शेती आणि मजुरीचे काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करत होता.(केसीएन)दरम्यान त्याचे चुलतभाऊ प्रवीण जगन चव्हाण यांचेसोबत सुनिल चव्हाण यांचा शेत जमीनीचा जूना वाद होता. दि. २५ मार्च रोजी सायंकाळीच्या सुमारास सुनील हा मित्रांसोबत जेवण करण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ एसी ४४७३) ने निघून गेला होता. दरम्यान त्यानंतर तो घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी २६ मार्च रोजी सकाळी ६ वाजता सुमारास सुनील चव्हाण याचे नातेवाईक रस्त्यावरून येत असताना टाकळी शिवारातील सुरेश चव्हाण यांच्या शेताजवळ सुनिल चव्हाण यांचा दुचाकीजवळ मृतदेह आढळून आला.
यावेळी त्याच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचे दिसून येत होते. दरम्यान, या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात मयत सुनील चव्हाण यांचा भाऊ संजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रवीण जगन चव्हाण आणि बाळू ममराज जाधव (दोन्ही रा.टाकळी ता. मुक्ताईनगर) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील एकाला अटक केल्याचे समजते. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील करीत आहे.