सरकारी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुरु
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात मुसळधार पाऊस व विजेच्या तडाख्यामुळे मागील दोन दिवसात जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतपिकांचे, घरांचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच महसूल व कृषी खात्याचे अधिकारी यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. बाधित कुटुंबांना तात्पुरते निवारा, अन्न, पिण्याचे पाणी व बिछायतची व्यवस्था करण्यात आली आहे.
अमळनेर तालुका – पातोंडा व नांद्री गावांतील पारधी वस्त्यांना पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना शाळा व स्थानिक भवनात हलविण्यात आले.
भडगाव तालुका – कनाशी व बोरनार येथे कपाशीचे नुकसान, कोठली येथे ऊस पिकाचे नुकसान.
रावेर तालुका – नागझिरी नाल्याला पूर; बक्षीपुर येथे घराची भिंत कोसळून सात-आठ शेळ्या दगावल्या.
जळगाव तालुका – वडली जवखेडे व बोरनार-लमांजन शिवारात पिकांचे नुकसान.
धरणगाव तालुका – कल्याणे खुर्द येथे नुकसान पाहणी.
पारोळा व एरंडोल तालुका – विविध शिवारात पिकांची हानी.
बोदवड तालुका – घरावर झाड कोसळून नुकसान; घरातील व्यक्तींना सौम्य दुखापत.
पाचोरा तालुका – लासगाव, सामनेर येथे पीकनुकसानीची पाहणी.
जिल्हा प्रशासनाने कळविले आहे की, आपत्तीग्रस्तांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.शासन ठामपणे आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी आही. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होतील. मदत वेळेत व पारदर्शकपणे पोहोचविली जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.