जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण १७ संवर्गांसाठी ५ ऑगस्टपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सदरची भरती प्रक्रिया आयबीपीएस या कंपनीमार्फत पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रिया दरम्यान जिल्हा परिषदेतील विविध संवर्गाची ६२६ पदे भरली जाणार आहेत. संपूर्ण राज्यात एकाचवेळी परीक्षा होणार असल्याने उमेदवारांनी शक्यतो एका पदासाठी एकाच जिल्ह्यात अर्ज करावे असे आवाहन करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली बहुचर्चित जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया ५ ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार असून भरती प्रक्रिया साठीची जाहिरात ५ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. संपूर्णपणे ऑनलाईन पार पडणाऱ्या या भरती प्रक्रियेत जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागातील १७ संवर्गातील एकूण ६२६ पदे भरण्यात येणार आहेत. भरती प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून जळगाव जिल्हा परिषदेची संपूर्ण तयारी झालेली असून भरती प्रक्रिया योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली जाईल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार यांनी दिली आहे.
भरती प्रक्रिया पारदर्शकपणेच राबविली जाणार
भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने आयबीपीएस कंपनी मार्फत घेण्यात येणार आहे. प्रक्रियेत संपूर्णपणे पारदर्शकता असेल. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या प्रक्रियेत उमेदवारांनी मुदतीत अर्ज करावेत.
-श्री. अंकित (मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव)