जागतिक व्याघ्र दिनानिमित्त जनजागृती रॅलीला प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) : जास्तीत जास्त वनीकरण करून निकृष्ट वनांचे रूपांतर चांगल्या जंगलात केले तर भविष्यात वाघांची संख्या वाढेल आणि मानव-वन्यजीव संघर्षसुध्दा वाढणार नाही. यासाठी पोलीस, वनविभाग तसेच सवीनी सोबत राहून काम केले तसेच लोक सहभाग वाढवून काम केले तर वाघांचे संरक्षण करणे सोपे होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वन्यजीव संरक्षण संस्था आणि वनविभाग यावल, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅली काढण्यात आली. जळगाव शहरातील लांडोरखोरी वन उद्यान येथे ‘वाघ वाचवा’चा नारा देत जनजागृती रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. (केएसएन)या वेळी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, वनविभाग यावल उप वनसंरक्षक जमीर एम. शेख, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १०:३० वाजता मान्यवरांच्या हस्ते रॅलीस हिरवी झेंडी दाखविण्यात येऊन मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
वाघ हा अन्न साखळीतील अतिशय महत्त्वाचा घटक असून त्याला राजासुद्धा म्हटले जाते. म्हणजेच त्याच्या अस्तित्वाचा संपूर्ण जंगलावर मोठा परिणाम दिसून येतो. त्याचे जंगलात असलेले अस्तित्व सिद्ध करते की, जंगल चांगल्या, समृद्ध स्थितीत आहे. (केएसएन)आपण व्याघ्र दिवसानिमित्त मोटरसायकल रॅली तसेच नुक्कड नाटकाचे माध्यमातून संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये जनजागृती करणार आहे. जास्तीत जास्त गावांना भेटी देऊन, लोकांना सर्व वन्यजीव आणि मुख्यत्वे वाघाचे संरक्षणाबद्दल संवेदनशीलता निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी यावल वन विभागाकडून आवश्यक सर्व मदत केली जाणार असल्याचे यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर एम शेख यांनी सांगितले.
वनविभाग यावल, वनविभाग जळगाव आणि वन्यजीव संरक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनजागृती कार्यक्रमात संस्था अध्यक्ष रवींद्र फालक, अजय बावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर, नितीन बोरकर वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव, परिमल साळुंखे वनपरिक्षेत्र अधिकारी वढोदा रेंज, निमंत्रक बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, केंद्रीय पर्यावरण सक्षमीकरण समितीचे सदस्य राजेंद्र नत्रवरे, स्कायनेटचे उदय पाटील, शिवराज पाटील, संजीव सटाले, दिशा फाउंडेशनचे विनोद ढगे, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष संतोष इंगळे, सचिन अमळकर, समीर साने, संस्था पदाधिकारी तसेच १५० व्याघ्र दूत आदी पर्यावरण स्नेही सहभागी झाले होते.