जामनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. १३५ शेतकऱ्यांच्या केळी, कापूस पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह बुधवारी नदीपात्रात आढळून आले आहेत.
अतिवृष्टीतमुळे जामनेर तालुक्यातील हिवरी दिगर, पिंपळगाव खुर्द, पिंपळगाव बुद्रुक, वाकोद, भराडी, पहूर, फत्तेपूर या गावांतील शेतकऱ्यांच्या केळी व कापूस या पिकांचे नुकसान झाले. हिवरी दिगर, शहापूर व पहूर यांसह ५५ गावांतील घरांचे नुकसान झाले आहे. शहापूर येथील खडकी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या मोहन पंडित सूर्यवंशी (४६, रा. शहापूर, ता. जामनेर) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी ओझर खुर्द गावाजवळ कांग नदीपात्रात आढळून आला.
येथील केदार पावरा (२४, रा. मुंदखेडे) यांचा मृतदेह गारखेडे गावाजवळ आढळून आला. हिवरखेडे दिगर येथील वाघूर नदीकाठावर असलेल्या चरण ओंकार पाटील यांच्या ६०० झाडांचे नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर व्हावा अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली आहे.
कमानी तांडा, पिंपळगाव कमानी, पिंपळगाव बुद्रुक व खुर्द, वाकोद व पहूर परिसरातील सुमारे ७०० ते ८०० हेक्टर क्षेत्रातील उभ्या पिकांत पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मका, केळी, कापूस व तूर पिकांचे नुकसान झाल्याने प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी होत आहे.
फत्तेपूर, तोंडापूर, वाकोद व पहूर मंडळांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. हिवरी दिगर येथील १० घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने बाधित परिवाराला शासनाने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे गुरुवारी दि. ५ रोजी जामनेरात येत आहेत. त्यांच्या हस्ते हिवरखेडा येथे वाघूर धरणाचा जलपूजनाचा कार्यक्रम होत आहे.