जळगाव (प्रतिनिधी ) ;- शंकरराव नगर – सुनील नगर परिसरात 15 ऑगस्ट रोजी 77 वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि गर्वाने साजरा करण्यात आला. परिसरातील नागरिकांनी एकत्र येत या राष्ट्रीय सणाला भव्य स्वरूप दिले. सकाळी 7.30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. राष्ट्रगीताने वातावरणात देशभक्तीची भावना जागवली गेली. त्यानंतर उज्वल पाटील यांच्या अध्यक्षतेखालील प्रमुख पाहुण्यांनी राष्ट्रध्वजाला वंदन करून प्रतिमा पूजन केले.
या प्रसंगी उपाध्यक्ष बंटी पाटील, गोविंदा नारखेडे, खुशी पाटील, पुजा पाटील, सरिता विसपुते,दीपाली पाटील,सपना बागले, सुषमा ताई, प्रेम वाणी, सौ. नारखेडे ,भानुदास चौधरी, श्री. खडके व परिसरातील असंख्य बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू यांच्यासह इतर स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याची आठवण करून पुष्पांजली अर्पण केली. भारत माता व छत्रपती शिवाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
अध्यक्ष उज्वल पाटील यांनी आपल्या मनोगतात स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून दिली. त्यांनी उपस्थित नागरिकांना भारताच्या स्वातंत्र्य संघर्षाची महती सांगितली आणि आजच्या तरुणांनी देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे, त्यांनी समाजातील एकजुटीवर भर देत, सर्वांनी मिळून एकत्र कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी देशभक्तीपर गीतांनी वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली.
उपस्थितांनी देशासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात न्हावून गेला होता.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिसरातील नागरिकांनी विशेष सहकार्य केले. या उत्सवाने सर्वत्र देशप्रेमाची भावना अधिकच वृद्धिंगत केली.