आत्मशुद्धतेच्या मार्गामध्ये संयम खूप मोलाचे आहे. संयम हे चार प्रकारचे असते मन, वचन, काया, उपकरण यातून संयम साधता येतो. संयम का आणि कशासाठी केले पाहिजे. इंद्रीयांवर सक्तीने नाही तर श्रद्धेने नियंत्रण मिळविणे म्हणजे संयम होय. एखाद्याने दीक्षा घेतली म्हणजे ते संयम नसून इंद्र म्हणजे आत्मा व इंद्रिय म्हणजे आत्मा ज्यांच्या माध्यमातून इंद्रियांची अनुभूती घेतो त्याला इंद्रिय म्हटले जाते. इंद्रीय हे मारक आणि तारक आहे. कानाने काय ऐकले पाहिजे, तोंडाने काय बोलले आणि काय सेवन केले पाहिजे, नाकाने कुठला गंध, जिभेने कुठला रस आणि हाताने कसला स्पर्श अनुभवला पाहिजे हे विवेकपूर्ण पद्धतिने ठरविले पाहिजे. तप, तपस्यांद्वारे इंद्रियांवर नियंत्रण मिळविता येेते. जे कामाचे व योग्य आहे त्या सकारात्मक विचारांचे ग्रहण केले पाहिजे, नाही तर दिवसभर कानात हेडफोन आणि डि. जे. च्या डेसिबलमुळे आपआपसांत संवाद कमी होत आहे. घरा-घरात मतभेदाचा आवाज वाढला आहे. आत्मशुद्धतेच्या चार मार्गापैकी संयम म्हणजे इंद्रियांवर विवेकपुर्ण नियंत्रण ठेवलेच पाहिजे, असे मौलिक विचार शासनदीपक परमपुज्य सुमितमुनिजी महाराज साहेब यांनी स्वाध्याय भवन येथील धर्मसभेमध्ये श्रावक-श्राविकां समोर मांडले.
मोक्षप्राप्तीसाठी मनात शुभ भावनांची निर्मिती करा. मोक्ष प्राप्तीचे दान, शिल, तप, भाव हे चार मार्ग सांगितले जातात. त्यात भावनांना विशेष महत्त्व आहे. दान देण्यासाठी भाव असला पाहिजे. भावनांवर नियंत्रण असेल तर शिल सांभाळता येते. शुद्ध भावनेशिवाय तपसुद्धा होऊ शकत नाही. दान, शिल, तप या तिघं मार्गांना शुभ भावना सहकार्य करत असते. भावनाशील आचरण मनुष्याला मोक्षप्राप्ती साठी प्रेरक ठरते. यासाठी महाराजा प्रसन्न व राजश्री, अर्जून माळी यांचे दृष्टांत सांगत भावनांवर नियंत्रण ठेवत साधनेतून मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळू शकतो, असे विचार आरंभी परमपूज्य श्री. भुतीप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी व्यक्त केले.