जळगावात जीर्ण इमारती उठल्या जीवावर
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत एक महिला इमारतीखाली दाबली गेली होती. तब्बल पाच तासांच्या बचाव कार्य तसेच शोध मोहिमेनंतर महिलेचा मृतदेहच मिळाला असून हळहळ व्यक्त होत आहे.
राजश्री सुरेश पाठक (वय ७०) असे या मयत वृध्द महिलेचे नाव आहे. शिवाजी नगरात ७४ वर्ष जुनी इमारत पाठक यांची आहे. या इमारतीमध्ये ते राहत नव्हते. या इमारतीचे मालक पाठक कुटुंबीय या ठिकाणी पूजा करण्यासाठी तसेच पाणी भरण्यासाठी येतात. त्यानुसार आज मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी पाठक कुटुंबीय पाणी भरण्यासाठी तसेच पूजा करण्यासाठी आले होते. याच दरम्यान सकाळी साडेआठ वाजता अचानक ही तीन मजली इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले व बचाव कार्य सुरू केले. यात तीन जणांना वाचविण्यात यश आलं.
राजश्री पाठक या वृध्द महिला इमारतीच्या ढीगाऱ्याखाली अडकल्या. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यान तब्बल ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर राजश्री पाठक यांना बाहेर काढण्यात आले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.
पालकमंत्र्यांसह अधिकाऱ्यांची भेट
अनेक वर्षापासूनची ही जीर्ण इमारत खाली करण्याबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित कुटुंबीयांना नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही ती इमारत रिकामी करण्यात न आल्याने आज ही दुर्घटना घडली. दरम्यान, सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांच्यासह विविध अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तत्काळ मदत सुरु असल्यामुळे तिघांना बाहेर काढता आले, असे ते म्हणाले. तसेच, जळगाव शहरात ज्यांना जुन्या इमारती खाली करण्याबाबत मनपाच्या नोटिसा आल्या आहेत, त्यांनी त्या रिकाम्या कराव्या. जेणेकरून अशी दुर्दैवी घटना घडणार नाही, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.