बीड ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील गेवराई जवळ कार आणि ऑईल टँकरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या पाच पदाधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. औरंगाबादकडे जात असताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात पाच पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. लातूरचे वंचितचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचा मृतात समावेश आहे. गेवराई बायपास जवळ झालेल्या अपघातातील सर्व पदाधिकारी लातूरचे रहिवासी आहेत.

गेवराई शहरापासून दोन किमी अंतरावर असणा-या बायपासजवळ कारचा भीषण अपघात झाला. अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या पाच पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्व पदाधिकारी लातूरचे रहिवासी असल्याची माहिती आहे. ते लातूरहून बीड मार्ग औरंगाबादकडे जात होते. हा अपघात कारचालकाचा ताबा सुटल्याने झाल्याचं सागण्यात येत आहे. चालकाचा ताबा सुटल्याने कार ऑईल टँकरला जाऊन धडकली. या भीषण अपघातात पाच मृत्यू झाला आहे. काही मृतांची नावे अद्याप समजलेली नाहीत. एका जखमीवर बीडमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त कारवरुन गाडीतून प्रवास करणाऱ्या व्यक्ती वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असल्याचे स्पष्ट झाले.
अपघातग्रस्त कारमध्ये मराठवाडा पदवीधर निवडणुकीचे प्रचार साहित्य होते. त्यावरून सर्वजण वंचितच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जात असल्याचे समजते. सर्व पदाधिकारी लातूरचे रहिवासी असून ते लातूरहून बीड मार्गे औरंगाबादकडे जात होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. पोलिसांनी क्रेन बोलावून कार बाजूला केली.







