नदीपात्राजवळच्या गावांना सुरक्षिततेसाठी आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) :- हतनूर धरणाच्या (पूर्णा व तापी नदीच्या) पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस व वाढलेला येवा तसेच धरण पातळीत झालेली वाढ लक्षात घेऊन आज दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता धरणातून १५९८ क्युमेक्स (५६४३३.३७ क्युसेक्स) इतका प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
यासाठी धरणाची ४ गेट पूर्णपणे व १६ गेट प्रत्येकी १ मीटर इतकी उघडण्यात आली आहेत. तापी व पूर्णा नदीकाठी राहणाऱ्या गावातील नागरिकांनी नदीकाठावर न जाणे, पोहणे, मासेमारी करणे तसेच गुरे-ढोरे बांधणे टाळावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी दक्षता बाळगावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.