जळगाव ( प्रतिनिधी ) – हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने पाण्याची आवक सतत वाढत आहे आज सायंकाळपर्यंतक या धरणातून अतिरिक्त पाणी सोडावे लागणार आहे. असे पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे. तापी काठावरील गावातील नागरीकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून पूर्णा नदीलाही पूर येत आहे. त्यामुळे पाणी पातळी सतत वाढल्याने धरणातील आवक वाढत आहे. सध्या धरणाचे 4 दरवाजे पूर्ण तर 2 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले असून यातून 27 हजार 828 क्युसेक तर कालव्यातून 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरु आहे. पूर्णा नदीचे पुराचे पाणी सायंकाळपर्यंत हतनूर धरणात पोहोचण्याची शक्यता असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडावा लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाने प्रशासनास कळविले आहे.
तापी नदीकाठावरील गावातील सर्व नागरिकांनी सावध रहावे. लोकांनी नदी पात्रांमध्ये जावू नये, गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात जाणार नाहीत. नदीपात्रालगतची शेती उपयोगी साहित्य, सामुग्री, पशुधन सुरक्षितस्थळी राहील याची दक्षता घ्यावी. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून काळजी घ्यावी. कुठलीही आपत्तीजन्य परिस्थिती लक्षात आल्यास त्वरीत प्रशासनास सूचित करावे, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी कळविले आहे.