नागरिकांना सावधानतेचा इशारा
रावेर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वाघूर नदीने धोक्याची पातळी गाठली असून काही घरांचे नुकसान झाले तर हातनूरच्या पाणलोट क्षेत्रात २०६.४ मिलिमीटर पाऊस झाल्याने हतनूर धरणाचे २० दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. यामधून ९९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे असलेले हतनूर धरण व या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २०६.४ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. यामध्ये बऱ्हाणपूर ३४.८, देड तलाई २९. ४, टेक्सा १८.४, एरंडी ४.८, गोपालखेडा २५, चिखलदरा ५५.६, लखपुरी ८. २, लोहटार ८.८ ,अकोला २१. ४ असे एकूण २०६.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर हतनूर परिसरामध्ये ३८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी नदीपात्र परिसरात जाऊ नये तसेच पशुधनही सोबत नेऊ नये अशा सुचना करण्यात आल्या आहेत. आपातकालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्र. 0257-2217193 संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.