जळगाव (प्रतिनिधी) : नाशिक व जळगावकडील गिरणा प्रकल्प आज दि. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ पर्यंत ७४% भरलेला आहे. गिरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असून सध्यास्थितीत गिरणा प्रकल्पामध्ये अंदाजे ३५ हजार ते ४० हजार क्युसेक्स इतका विसर्ग येत आहे, तरी धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने गिरणा प्रकल्पातून कोणत्याही क्षणी नदीमध्ये पाणी विसर्ग सोडण्यात येईल, असे उपविभागीय अभियंता यांनी कळविले आहे.
नदीप्रवाहात कोणीही जावू नये. तसेच नदीकाठलगतच्या आपली पशु-धन, चीजवस्तु, शेतीमोटार पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी असे धरण व्यवस्थापन व प्रशासकीय यंत्रणा यांच्याद्वारे आवाहन करण्यात येत आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग, चाळीसगांव यांनी दिली आहे.