जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथील एका इयत्ता दहावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरी दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
वैभव रवींद्र ठाकूर (वय १६ रा. रायपूर कुसुंबा ता.जळगाव) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. वडील खाजगी चालक म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात.(केसीएन)तर वैभव ठाकूर हा इयत्ता दहावीच्या वर्गात कुसुंबा येथील श्री स्वामी समर्थ संस्थेच्या विद्यालयात शिकत होता.
दरम्यान शुक्रवारी दि. १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घरी कोणी नसताना त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची आई व भाऊ जेव्हा घरी आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी वैभव ठाकूर याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. रुग्णालयामध्ये परिवाराने मन हेलावणारा आक्रोश केला. या घटनेमुळे रायपूर कुसुंबा गावात शोककळा पसरली आहे. घटनेबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.