अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा
अमळनेर (प्रतिनिधी) :- शेती उताऱ्यावर सामूहिक नाव असेल, मिळणारे अनुदान ५० हजारापेक्षा कमी असेल आणि शेतीचे वाद नसतील तर प्रतिज्ञापत्र बॉण्ड पेपरवर न घेता साधे लिहून घ्या आणि शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा अशा सूचना उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
शासनाकडून कापूस आणि सोयाबीन अनुदान हेक्टरी ५ हजार रुपये जाहीर केले आहे. मात्र उता-यावर सामूहिक नावे असलेल्या शेतकऱ्यांना सुरुवातीला साधे प्रमाणपत्र मागवण्यात आले. त्यावेळी सातबारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड आदी कागदपत्रे गोळा करण्यात आले. त्यांनतर प्रशासनाकडून पुन्हा १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र आणि पुन्हा सर्व कागदपत्रे नवीन मागवण्यात आले. सध्या लाडकी बहीण योजना सुरु असल्याने होणारी गर्दी पाहता शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शेतीकामाचे नुकसान होत आहे.
कमी अनुदानासाठी इतका खर्च आणि त्रास सहन करावा लागतो याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यावर उपविभागीय अधिकारी खेडकर यांनी, ज्या कुटुंबात वाद आहेत तेथेच फक्त बॉण्ड पेपर वर प्रतिज्ञापत्र घ्यावे अशा सूचना देऊन शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. यापूर्वीचे अनुदान फक्त आधारकार्ड आणि बँक पासबुकवर टाकले गेले. मात्र आता नव्याने सूचना प्राप्त झाल्याने प्रत्येक शेतकऱ्याचा लिंकिंग मोबाईल नंबर आवश्यक केल्याने पुन्हा नंबर मागवण्यात येत आहेत, अशी माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली आहे.