आ. एकनाथराव खडसे यांचा घणाघात, पहूर येथे जाहिर सभा
जामनेर (प्रतिनिधी) :- जेथे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमक्या येतात, त्यांची सुरक्षा वाढविली जाते, तेथे आम्हाला तुम्हाला काय सरंक्षण मिळणार ? राज्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. महायुतीला मत मागण्याचा अधिकार तरी आहे का ? अशी घणाघाती टीका करून माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी तालुक्यातील पहूर येथील जाहीर सभा गाजविली. महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांना आशीर्वाद द्या असे प्रतिपादन माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी केले.
जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवडे बाजार परिसरात महाविकास आघाडीची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे यांच्यासह शिवसेनेचे संजय सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रा. कविता म्हेत्रे माळी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. खडसे म्हणाले, विविध योजनांच्या नावाखाली महायुतीच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. पुण्यासह राज्यभरात गुन्हेगार सर्रास शस्त्राने वार करण्यास मागेपुढे पाहत नाही, अशा शब्दात आ. खडसे यांनी घणाघात केला.

दिलीप खोडपे यांच्यासारखा शांत व संयमी व्यक्ती तसेच शिक्षक असलेले उमेदवार आता आपण तालुक्यात निवडून आणले पाहिजे. त्यासाठी आता परिवर्तन घडवा. गेल्या ३० वर्षानंतर नवीन आमदार आता झाला पाहिजे, असेदेखील आ. खडसे यांनी सांगितले. ऐन दिवाळीत महागाई वाढली. सर्वसामान्य जनता महागाईला होरपळते आहे. काय करायचे तुमच्या दीड हजाराला ? तुमच्या वाटप केलेल्या साडीला ? शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, अशी टीका करून, आता जामनेर तालुक्यात बदल झालाच पाहिजे, असेही ते म्हणाले.
