मुंबईच्या एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल आणि पक्षाच्या विचारधारेबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी ठाण्यातील भाजप पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. ‘शहर विकास आघाडी’ नावाचे फेसबुक पेज आणि डॉ. संग्राम पाटील यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.


भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक निखील शामराव भामरे यांनी ही तक्रार दिली आहे. १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:१९ च्या सुमारास लोअर परेल परिसरातून जात असताना, त्यांना फेसबुकवर पक्षाच्या नेत्यांविरुद्ध चिथावणीखोर पोस्ट आढळल्या. ‘शहर विकास आघाडी’ या फेसबुक पेजवरून १४ डिसेंबर रोजी पक्षाच्या प्रमुख नेत्यांबद्दल आणि एका महिलेबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरचे लिखाण करण्यात आले, असे तक्रारीत म्हटले आहे. डॉ. संग्राम पाटील यांच्या फेसबुक अकाऊंटवरूनही पक्षाची प्रतिमा मलीन करणारा आणि समाजात दोन गटांत शत्रुत्व निर्माण करणारा मजकूर शेअर करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
तक्रारदाराने दोन्ही फेसबुक प्रोफाईल आणि संबंधित पोस्टच्या लिंकसह स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे सुपूर्द केले आहेत. “पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि चुकीची माहिती पसरवून समाजात द्वेष निर्माण करण्यासाठी हा खोटी माहितीचा प्रसार जाणीवपूर्वक करण्यात आला आहे,” असे निखील भामरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत आणि संबंधित कलमान्वये दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
“केसरीराज”च्या प्रतिनिधीने डॉक्टर संग्राम पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदरची कारवाई ही सूडबुद्धीने व राजकीय हेतूने करण्यात आलेली मला प्रथमदर्शनी दिसत आहे. तरी याबाबत पुढील भूमिका मी लवकरच मांडणार आहे.









