पनवेलच्या कामगाराचा जळगावात मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे कंपनीत काम करणारे तीन कामगार सुटी घेऊन रेल्वेतून उत्तर प्रदेशातील घरी जात होते. दरम्यान, एका कामगाराला छातीत दुखत असल्याने प्रकृती बिघडली. त्याला जळगावात उपचारासाठी उतरविल्यानंतर शासकीय रुग्णालयात नेत असताना रुग्णालयाच्या गेटवरच त्यांचा हृदयविकाराचा झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. ४ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
पन्नालाल गोपी हरसन (वय ४२, रा. गोरखपूर, उत्तरप्रदेश, ह. मु. पनवेल जि. रायगड) असे मयत इसमाचे नाव आहे. ते पनवेल येथे काही मित्रांसह कंपनीत मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, ते त्यांच्या गावाकडील २ मित्रांसह मंगळवारी दि. ४ जून रोजी गोरखपूर येथे जाण्यासाठी रेल्वेतून प्रवास करीत होते. जळगाव जिल्ह्यात रेल्वे आल्यावर पन्नालाल याना छातीत दुखून अचानक प्रकृती बिघडली. तेव्हा सोबतच्या मित्रांनी त्याला जळगाव रेल्वे स्टेशन येथे उतरविले. जळगावात औषधोपचार करून मग नंतर गावाला जाऊ असे त्यांनी ठरविले. दरम्यान, रेल्वे पोलिसांना कळवून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पन्नालाल हरसन यांना घेऊन जात होते.
दरम्यान, रुग्णालयाच्या गेटवर असतानाच वाटेतच त्यांना जोरदार हृद्यविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासून त्यास मयत घोषित केले. घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.