मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्रकार परिषदेत माहिती उघड
आयुक्तांवरील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याची भाजपवर नामुष्की
जळगाव (प्रतिनिधी) – भाजपच्या नगरसेवकांनी गेल्या चार दिवसांपासून
महानगरपालिकेसमोर आंदोलन केले. त्यानंतर आ. भोळे यांनी सरबत देऊन त्यांचे
आंदोलन सोडविले. मात्र, नगरसेवकांनी आंदोलनाचा निर्णय अचानक घेतला. या
आंदोलनाची कल्पना आम्हाला नव्हती. अन्यथा नगरसेवक व मनपा प्रशासनाचे
प्रमुख आयुक्तांमध्ये चर्चा घडवून आणली असती, अशी माहिती दस्तुरखुद्द
मंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी सोमवार दि. ३१ जुलै
रोजी संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे नगरसेवक आंदोलन करताना
नेत्यांना कल्पना देत नसल्याचे वास्तव भारतीय जनता पक्षात उघड झाले आहे.
तसेच, आयुक्तांवर मंगळवारी १ ऑगस्ट रोजी आणण्यात येणारा अविश्वास
प्रस्ताव मागे घेणार असल्याचे महाजन म्हणाले. त्यामुळे प्रस्ताव मागे
घेण्याची नामुष्कीदेखील भाजपवर आली आहे.

महानगरपालिकेसमोर भाजपच्या नगरसेवकांनी माजी उपमहापौर अश्विन सोनवणे
यांच्या नेतृत्वात तीन दिवस आंदोलन केले. मनपा प्रशासन आयुक्त हे
नगरसेवकांची कामे करीत नाहीत. त्यांच्या कामांच्या फाईल ह्या प्रलंबित
ठेवतात. असे विविध आरोप करून हे आंदोलन करण्यात आले. यात सर्वपक्षीय
पाठिंबा देखील घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र तीन दिवस चाललेल्या या
आंदोलनाची तिळमात्र कल्पना आमदार, मंत्री यांना नव्हती हे वास्तव समोर
आलेले आहे. यामुळे नगरसेवकांना आता चांगलाच दट्टू यानिमित्ताने बसला आहे.
मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे, आ.
मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी ३१ जुलै रोजी संध्याकाळी पत्रकार
परिषद झाली. त्यात मनपाच्या विषयी महाजन यांना विचारले असता ते म्हणाले
की, निधीवाटप, विकासकामे याबाबत नगरसेवकांची नाराजी होती. आम्हाला
नगरसेवकांच्या आंदोलनांची कल्पना नव्हती. अन्यथा चर्चा घडवून आणली असती.
नगरसेवक उपोषणाला बसले होते. आयुक्तांच्या कामकाजाविरुद्ध तक्रारी
होत्या, त्यांच्याशी चर्चा केली. आयुक्तांना काही गोष्टी सांगितल्या
आहेत. भविष्यात त्यांच्या कामकाजात सुधारणा होईल. नगरसेवकांशी आम्ही
बोललो आहे. अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास ठराव होऊन त्यांनी परत जावे असे
चांगले होणार नाही. त्यामुळे अविश्वास ठराव आम्ही मंगळवारी मागे घेणार
आहोत.
नगरसेवक ठाम होते. मात्र अविश्वास प्रस्ताव का मागे घ्यावा लागत आहे ?
असा प्रश्न गिरीश महाजन यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सावध
पवित्रा घेत माहिती दिली. याच्यावर आता तोडगा निघाला आहे. फारशी तफावत
निधीवाटपाबाबत नाही. कुठल्याही तक्रारी होणार नाही. महापालिकेचे काम
सगळ्यांनी मिळून आता करायचे आहे. आम्ही आयुक्तांना थोडी संधी दिली आहे.
अन्यथा शासनाकडे कारवाईचे अधिकार आहेच, असे त्यांनी सांगितले.
भविष्यात कामाबाबत, निधीवाटप याबाबत आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. मागील
काळात १०० कोटींचा निधी आणला आहे. त्यातून आता कामे सुरु आहेत. काही
रस्त्यांचे टेंडर निघाले आहेत. रस्त्यांचे कामे चांगल्या दर्जाचे झाले
पाहिजेत. कामाच्या दर्जाबाबत आम्ही कुठेही तडजोड करणार नाही.
डांबरीपेक्षा सिमेंट काँक्रिटचे रस्ते करायचे असे आम्ही ठरवले आहे, असेही
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले.