जामनेर पालिकेला जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नोटीस
जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर शहरात जुलै अखेर तीन डेंग्यू संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. शहरात सततच्या रिपरिप पावसामुळे डासांचे व माश्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच विविध संसर्गजन्य आजारातही वाढ होत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाकडून जामनेर नगरपालिकेला साथरोग, डेंग्यू, मलेरिया व जलजन्य आजाराबाबत उपाययोजना करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
शहरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच शहरात विविध आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. खाजगी व सरकारी दवाखान्यात रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे यात विशेषतः थंडी तापाचे रुग्ण अधिक आहेत. जामनेर नगरपालिकेने दि. १३ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत जामनेर शहरात डासअळी सर्वेक्षण, साचलेले पाणी वाहते करणे, गटारी वाहत्या करणे, नालेसफाई, कीटकनाशक पावडर टाकणे, औषध भरीत धूर फवारणी करणे, परिसर स्वच्छता करणे, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया विषयी, कोरडा दिवस पाळण्याविषयी जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.