पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे बुद्रुक येथील ५० वर्षीय महिला छतावर काम करीत असताना तिला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने जोरदार विजेचा धक्का बसला. यात त्या मृत्युमुखी पडल्या आहेत. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दुर्गाबाई नानू राठोड (वय वर्ष ५०, रा. वडगाव आंबे बुद्रुक ता.पाचोरा) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात चार मुले आहेत. गावात त्यांचे स्वतःच्या मालकीचे घर आहे. त्यांच्या घराजवळ लाकडी खांब करून त्याला विद्युत वाहिनीच्या तारा महावितरणाने बांधले आहेत. (केसीएन)मंगळवारी दि. १६ जुलै रोजी दुर्गाबाई राठोड या दुपारी त्यांच्या छतावर जाऊन पावसाचे साचलेले पाणी काढत असताना त्यांना विद्युत वाहिनीच्या तारांचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना विजेचा जोरात धक्का बसला.
ग्रामस्थ व कुटुंबीयांना घटना लक्षात येताच त्यांनी तातडीने पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थ संताप झाले होते.(केसीएन)या घटनेला महावितरण कंपनी जबाबदार असून संबंधित महिलेच्या कुटुंबाला न्याय न दिल्यास लवकर आंदोलन करणार असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.