तामिळनाडू राज्यातील वेलूर येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – दक्षिण भारतात फिरण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या वाहनावर भरधाव कंटेनर येऊन धडकल्याने जळगाव शहरातील दांपत्य ठार झाले. तर महिला आणि दोन चालक गंभीर जखमी झाले आहेत. दाम्पत्यांची मुले व सासरे हे दुकानात गेल्यामुळे ते या अपघातातून वाचले. यामुळे जळगाव शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ऋषभ सुरेशचंद तोडरवाल (वय ३८) व त्यांची पत्नी वृषाली ऋषभ तोडरवाल (वय ३६, दोन्ही रा. देवकर नगर, जळगाव) असे मयत दांपत्याचे नाव आहे. घटनेत ऋषभ यांच्या आतेसासू व दोन चालक गंभीर जखमी झाले आहेत.(केसीएन) दाम्पत्याचे दोन्ही मुले व वृषाली यांचे वडील दुकानावर गेलेले असल्याने ते सुखरुप आहेत. हा अपघात रविवारी दि. ८ जून रोजी तामिळनाडुतील वेलूर जवळ झाला. मंगळवारी रात्री मयताचे मृतदेह जळगावात पोहचले.
जळगावातील रहिवासी व सावदा येथे सुवर्ण पेढीमध्ये व्यवस्थापक असलेले ऋषभ तोडरवाल हे पत्नी वृषाली, मुलगी चहेती (वय ११), मुलगा तक्ष (वय ७) सासरे, आते सासू यांच्यासह दोन चालक घेऊन वाहनाने चेन्नई व दक्षिण भारतातील इतर ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. रविवारी दुपारी चार वाजता ते जेवणासाठी थांबले. त्यानंतर मुलांनी स्नॅक्स घेण्यासाठी आग्रह केला. त्यामुळे वृषाली यांचे वडील दोन्ही मुलांना घेऊन दुकानावर गेले. त्या वेळी एक भरधाव कंटेनर थेट वाहनावर येऊन धडकले.
त्यात वाहनासह कारमधील सर्व जण दाबले गेले. यात वाहनाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या ठिकाणी जेसीबी आणून कंटेनर बाजूला करण्यात आले व वाहनातील सर्व जणांना बाहेर काढण्यात आले. त्यात ऋषभ व वृषाली हे गतप्राण झाले होते तर इतर तिघे जण गंभीर जखमी झाले. अपघातात ऋषभ यांच्या आते सासूचे पाय फॅक्चर झाले व त्यानंतर त्यांना तेथे ह्रदयविकाराचा झटकादेखील आला. सर्व जखमींवर तामिळनाडू राज्यातच उपचार सुरू आहेत. मंगळवारी १० जून रोजी संध्याकाळी दोघांचे मृतदेह जळगावात दाखल झाले. मयत ऋषभ हे सुवर्ण व्यावसायिक स्वरुप लुंकड व मनीष लुंकड यांचे भाचे होत. घटनेमुळे जळगाव शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.