आघाडी म्हणून काही तासांत होणार “मविआ”ची भूमिका जाहीर
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- राजकारणाच्या वर्तुळातून खळबळजनक वृत्त समोर येत आहे. जळगाव शहर, भुसावळ, पाचोरा, अमळनेर हे ४ विधानसभा मतदारसंघ हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वाटेला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. जळगाव शहरातून ठाकरे गटातील काही नेत्यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या यादीत बदल होतील अशी माहिती खुद्द संजय राऊत यांनी दिल्यावर ठाकरे गटातच खळबळ उडाली आहे. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी मात्र, ‘वेट अँड वॉच’ अशी सावध प्रतिक्रिया “केसरीराज” कडे व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीत अद्याप शिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची यादी जाहीर झाली. मात्र याद्या महाविकास आघाडी मिळून जाहीर होतील. पक्ष म्हणून नाही अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची आहे.शिवसेनेच्या यादीत बदल होतील, असे नेते संजय राऊत स्वतः म्हटले आहे.(केपीएन)त्यामुळे पाचोरा विधानसभा मतदारसंघात वैशाली सूर्यवंशी यांच्याऐवजी काँग्रेसचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार राहील याबाबतही चर्चा सुरु आहे. चर्चेच्या गुऱ्हाळात भुसावळ येथील जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचे निश्चित असून येथून ३ इच्छुकांपैकी एकाला आ. सावकारे यांच्याविरोधात लढत देण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे अमळनेरातदेखील काँग्रेस पक्षाकडून शिवसेना ठाकरे गट व भाजपमधील काही नेते इच्छुक असून त्यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे मुलाखती दिल्या आहेत.
त्यामुळे विद्यमान आ. अनिल पाटील यांच्याविरोधात तुल्यबळ व उच्चशिक्षित उमेदवार देण्यासाठी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे. तर जळगाव शहर मतदारसंघासाठी आ. राजूमामा भोळे यांच्याविरोधात ठाकरे गट व शरद पवार गट यांच्याकडून उमेदवारी मिळत नसल्याने तसेच, काँग्रेस पक्षाने या जागेवरील दावा न सोडल्याने आघाडीत बिघाडी होत आहे.(केपीएन)ठाकरे गटाच्या एका नेत्याने काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन उमेदवारी मागितली आहे. मात्र त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी सकारात्मकता दाखविलेली नाही. या ठिकाणी पक्षाचाच कार्यकर्ता उमेदवार असावा, आयाराम नको असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शहरातून ४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहे.