जळगाव (प्रतिनिधी) – कच्चा कैदी चिन्या जगताप याचा जळगाव कारागृहात पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना अडीच वर्षांपूर्वी घडली होती. याप्रकरणी तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी आता राज्य शासनाच्या गृह विभागाचे उप सचिव विनायक चव्हाण यांनी ३ दिवसांपूर्वी आदेश काढले आहेत. प्रकरणात निर्भीडपणे लक्ष घालून जगताप परिवाराने यशस्वी पाठपुरावा सुरुवातीपासून सुरु ठेवला होता. त्याला आता आणखी यश आले आहे.
तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंगधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत अशी या संशयित आरोपींची नावे आहेत . ११ सप्टेंबर २०२० रोजी जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता . कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंगधिकारी जितेंद्र माळी, कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांनी मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे आरोप मयत चिन्या जगताप यांची पत्नी मीना जगताप यांनी केले होते. त्यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि नशिराबादच्या पोलीस निरीक्षकांना गुन्हा नोंदवावा म्हणून निवेदन दिले होते. मात्र पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला होता .
पोलीस दाद देत नाहीत हे लक्षात आल्यावर मीना जगताप यांनी उच्च न्यायालयात याचिका ( क्रमांक – १७०६ / २०२० ) दाखल केली होती. या याचिकेची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे . चिन्यांचा शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा अहवालात त्याच्या शरीरावर मारहाणीच्या २२ जखमा असल्याचे नमूद आहे . यासंदर्भात तत्कालीन तुरुंग रक्षक मनोज जाधव यांनी २६ नोव्हेंबर २०२१ रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला होता. मनोज जाधव या घटनाक्रमाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत . चिन्याला कशी मारहाण झाली याची माहिती त्यांनी आपल्या जबाबात दिली आहे . या आधीही न्यायालयीन चौकशीदरम्यान काही कारागृह बंदी यांनी या ५ आरोपींच्या विरोधात जबाब नोंदवलेले आहेत . कारागृह कायद्यानुसार ही घटना गंभीर असून पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यांनंतरच्या ४८ तासांच्या आत या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र तसे झाले नाही. नंतर १४ महिन्यांनी गुन्हा दाखल झाला.
आता राज्य शासनाने ६ एप्रिल रोजी आदेश काढून पेट्रस गायकवाड याला निलंबित केले आहे. निलंबन काळात गायकवाड याचे मुख्यालय अहमदनगर कारागृह असेल. पूर्वपरवानगीशिवाय त्याला मुख्यालय सोडता येणार नाही. रोज सकाळी व दुपारी पेट्रस गायकवाड याला हजेरी द्यावी लागणार आहे. निलंबन काळात कुठलीही नोकरी व धंदा करता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.