जळगाव ते सेवाग्राम रॅलीला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ
जळगाव (प्रतिनिधी) – व्यसन मानवी जीवन पोखरते. व्यसनामुळे संसार उध्वस्त होतात. त्यामुळे जळगावतून विदर्भात व्यसनविरोधात एल्गार करणाऱ्या रॅलीला विशेष महत्व आहे, असे प्रतिपादन आ.राजूमामा भोळे यांनी केले.
येथील चेतना व्यसनमुक्ती उपचार व समुपदेशन केंद्रातर्फे जळगाव ते सेवाग्राम अशी विशेष रॅली महात्मा गांधी यांची जयंतीदिवशी २ ऑक्टोबरपासून काढण्यात येत आहे. “व्यसनमुक्तीची वारी, आपल्या दारी” या घोषवाक्यद्वारा रॅलीच्या मार्गातील अनेक गावात व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार केला जाणार आहे. शुक्रवारी २ ऑक्टोबर रोजी व्यसनमुक्ती रथाला हिरवी झेंडी दाखवून आ.भोळे यांनी मार्गस्थ केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाल कल्याण समितीचे सदस्य डॉ.शैलजा चव्हाण, भाजपचे महानगरअध्यक्ष दीपक सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल तालुकाध्यक्ष रामधन पाटील, नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, संदीप रवींद्र पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रविण पाटील हे होते. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला डॉ.शैलजा चव्हाण यांनी माल्यार्पण केले. त्यानंतर चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी व्यसनमुक्त राहण्याची शपथ उपस्थितांना दिली. करोनाचा काळ सुरू असल्याने सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम झाला.
सूत्रसंचालन संजय विसपुते यांनी तर आभार प्रवीण पाटील यांनी मानले. यावेळी जनमत प्रतिष्ठानचे जनमत नाले, मनोज भांडारकर, अशोक राठी, डॉ.संतोष करांगे, आसिफ मेमन, सोनू पाटील, विजय सोनार,राजेंद्र गौड, प्रतीक सोनार उपस्थित होते.
रॅलीतून होणार सामाजिक बदलांची नांदी
चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांच्या संकल्पनेतून हि रॅली निघत आहे. २ ते ८ ऑक्टोबर व्यसनमुक्ती सप्ताह निमित्त पार्श्वभूमीवरदेखील याचे आयोजन आहे. एका वाहनात व्यसनमुक्तीविषयी असलेले स्लोगन लावून ती चित्ररथाद्वारे सजवून आकर्षित करण्यात आली आहे. व्यसन हा एक मानसिक आजार आहे, तो बरा होऊ शकतो हा आत्मविश्वास रॅलीतून दिला जाणार आहे.
जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ मार्गे वर्धा, सेवाग्राम येथे समारोप होणार आहे. विदर्भातील या मार्गावरील अनेक गावे व्यसनाच्या गर्तेत अडकले आहेत. त्यामुळे व्यसनाचे मानसिक, शारीरिक, आर्थिक, पारिवारिक, सामाजिक नुकसान होते. त्याविषयी जनजागृती केली जाणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाची भूमिका काय राहील ते सांगितले जाणार आहे. व्यसनामुळे मानवी आयुष्य उध्वस्त होत असल्यामुळे व्यसनांपासून कसे दूर राहावे ते सांगितले जाणार आहे.








