हनुमानवाडी परिसरातील घटना; ५ जणांवर गुन्हा दाखल
चाळीसगाव (प्रतिनिधी):- शहरातील हनुमानवाडी भागात गावठी कट्ट्यातून (पिस्तूल) गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी याप्रकरणी मुख्य संशयितासह पाच जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी सिकंदर शेख निसार शेख (वय ३६, रा. अनिल नगर, चाळीसगाव) हे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. दि. १५ मार्च रोजी रात्री ८:१५ ते ८:३० वाजेच्या सुमारास त्यांना संशयित आरोपी अंकित मोरे याने हनुमानवाडीतील आपल्या घराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये बोलावून घेतले. त्या ठिकाणी अंकित मोरे, मेहुल रत्नपाल मोरे, कृष्णा जिभाऊ झेल्टे आणि इतर दोन अनोळखी तरुण उपस्थित होते.
फिर्यादीनुसार, अंकित मोरे याच्या सांगण्यावरून तेथे असलेल्या एका अनोळखी तरुणाने त्याच्याकडील दोन गावरान कट्टे दाखवले. “हे बघ मख्खन जैसा है” (हे लोण्यासारखे मऊ चालते) असे म्हणत त्याने कट्ट्याचा खटका दाबला. यावेळी अचानक गोळी सुटली आणि ती थेट सिकंदर शेख यांच्या उजव्या खांद्यात घुसली. गोळी लागल्याने सिकंदर शेख रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि गंभीर जखमी झाले. गोळी लागल्यानंतर जखमी सिकंदर यांना मदत करण्याऐवजी अंकित मोरे याने त्यांना धमकावले. “इथून निघून जा, कोणाचेही नाव घेऊ नको,” अशी धमकी देऊन सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी तातडीने सूत्रे हलवली. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पंडित माळी करत आहेत. शहरात अशा प्रकारे सर्रासपणे घातक शस्त्रांचा वापर होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.









