चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावात होत असलेला बालविवाह ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी मुला-मुलींच्या आई- वडिलांचे प्रबोधन करून त्यांना समजपत्र देवून हा विवाह रोखला आहे.
कायद्याने २१ वर्षांखालील मुलगा व १८ वर्षाखालील मुलीचा विवाह करणे हा गुन्हा असून अशा बालविवाहांवर बंदी असली तरी काही मात्र लोक बालविवाह लावून देत आहेत. चाळीसगाव तालुक्यात असाच होणारा बालविवाह सजगतेमुळे रोखण्यात आला. बालविवाह लावून देणाऱ्या वधु- वरांच्या आई वडिलांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात आले.
चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल राजपूत, हवालदार तुकाराम चव्हाण, एक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रेन, आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेरचे श्रीराम राठोड यांनी सोबत कारवाई केली. बालविवाह होत असलेल्या गावात जाऊन हा विवाह रोखला.