मुंबई ( प्रतिनिधी ) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधितांच्या घरे किंवा कार्यालयांवर आयकर खात्याने टाकलेल्या छाप्यांचा संबंध भाजपशी जोडणे व लखीमपूर खिरीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेमुळे हे छापे मारण्यात आल्याचा दावा म्हणजे विनोद आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे

चंद्रकांत पाटील म्हणाले ‘काल राज्यातील विविध ठिकाणी आयकर खात्याने मारलेले छापे गेले सहा महिने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे आहेत, असे त्या खात्याने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या लखीमपूर खिरीबाबत शरद पवार यांनी खंबीर भूमिका घेतली म्हणून छापासत्र झाले असावे, असे सांगणे हा विनोद आहे. २५ निवासस्थाने आणि १५ कार्यालयांवरील छापे हे एकदोन दिवसांच्या तयारीने होऊ शकत नाही. आयकर खात्याने बरीच तयारी केली असावी, हे कारवाईच्या व्यापक स्वरुपावरून दिसते.
आयकर विभाग ही स्वतंत्र केंद्रीय यंत्रणा आहे. ती तिच्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीत काम करत असते. आयकर विभागाने काही व्यवहार उघडकीस आणले तर त्याला कायदेशीर पद्धतीनेच उत्तर दिले पाहिजे. अशा छाप्यांचा संबंध भाजपाशी जोडून राजकीय रंग देणे आणि स्वतःला निर्दोष ठरविण्याचा प्रयत्न करणे हास्यास्पद आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणले.
एखाद्या व्यक्तीविषयी शंका आल्यास चौकशीचा अधिकार तपास यंत्रणांना आहे. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी छापे टाकण्याचा प्रकार म्हणजे अधिकाराचा गैरवापर आहे. उत्तर प्रदेशातील हिंसाचारानंतर मी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या रागातून सत्ताधाऱ्यांनी ही कारवाई केली असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. तपास यंत्रणांचा गैरवापर आणखी किती काळ सहन करायचा, हे आता नागरिकांनी ठरवावे, असा सवालही पवार यांनी केला होते .
उत्तरप्रदेशात शेतक ऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्यानंतर मी या प्रकाराची तुलना जालियानवाला बागेतील हत्याकांडाशी केली. त्या प्रतिक्रियेमुळे सत्ताधाऱ्यांना राग आल्याने त्यांनी अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केली असावी, असे त्यांनी नमूद केले. तपास यंत्रणांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानांवर छापे टाकणे, हा प्रकार म्हणजे अधिकारांचा अतिरेक असल्याचे पवार म्हणाले.







