एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील घटना, मुक्ताईनगरला शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) – मुक्ताईनगरमधील पाटील कुटुंब शिर्डीवरून साईबाबांचं दर्शन घेऊन परत येत असताना एरंडोल जवळ कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर पतीसह ३ मुले गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना एरंडोल ते धरणगाव दरम्यानच्या पिंपळकोठा गावाजवळ घडली आहे. एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
मुक्ताईनगर येथील शिक्षक राजेश वासुदेव पाटील (वय ४६) हे पत्नी रुपाली पाटील (वय ४०) आणि तीन मुलांसह शिर्डीला देवदर्शनासाठी गेले होते. सोमवारी २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२.३० वाजता मुक्ताईनगरकडे परतत होते. (केसीएन)त्यावेळी एरंडोल ते जळगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर यूपी ढाब्यासमोर अचानक आलेल्या कंटेनरने (डब्लू बी २३ एफ ९४७२) त्यांच्या मारुती स्विफ्ट कारला (एमएच १९ सिक्यू ७००९) रस्त्यावर अचानक मागून धडक दिली. धडकेनंतर कार रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळली. हा अपघात इतरका भीषण होता, की अपघातात राजेश पाटील यांच्या पत्नी रुपाली पाटील आणि तीन मुलं – खुशी, स्वरा आणि गुरु हे सर्व जण गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतलं. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुपाली पाटील यांना मृत घोषित केलं.(केसीएन) त्याचवेळी ३ मुलांना एरंडोल येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं. कंटेनर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अचानक वाहन रस्त्यावर आणल्यामुळे अपघात झाला, असे फिर्यादी राजेश पाटील यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर राजेश पाटील यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, कंटेनर चालकाविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.