बालनिकेतन विद्यामंदिर, वाणी माध्यमिक विद्यालय येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : विकसित भारतासाठी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासूपणा, चिकित्सकवृत्ती आणि प्रयोगशीलता असायला हवी. यामुळे नवीन शास्त्रज्ञ तर निर्माण होतीलच मात्र शोधक बुद्धीचे नागरिक तयार होतील. आपण बुद्धीवादी बनून विज्ञानवादी व्हावे, अंधश्रध्देला बळी पडू नका, असे प्रतिपादन प्रा.डाॅ.युवराज वाणी यांनी केले.
शहरातील कमल वाणी बालनिकेतन विद्यामंदिर, ललिता वाणी माध्यमिक विद्यालय येथे आज शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिननिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंचावर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.युवराज वाणी होते. प्रमुख अतिथी म्हणून सचिव गोवर्धन पाटील, मराठी विज्ञान परिषदेचे प्रा.रविंद्रसिंह पाटील, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी, समुपदेशक मानसशास्त्रज्ञ मिनाक्षी चौधरी, माजी मुख्याध्यापिका सौ.शालिनी पाटील तसेच शाळेचे मुख्याध्यापक डॉ.रवीन्द्र माळी, नीलेश नाईक व ज्योती सपकाळे इ.मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शास्त्रज्ञ सी.व्ही.रमण व इतर शास्त्रज्ञांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.
सहशिक्षिका वंदना नेहेते यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व व आपल्या जीवनावरील विज्ञानाचा परिणाम यावर माहिती सांगितली. यानंतर मिनाक्षी चौधरी यांनी पाण्याचा दिवा पेटविणे आणि व प्रा.रविंद्रसिंह पाटील यांनी मंत्राने अग्नी पेटविणे याचे प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या आविष्काराबाबत मार्गदर्शन केले. आपण विज्ञानाची सृष्टी घेतली पण दृष्टी घेतली नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले. तद्नंतर इ.८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यींनींनी “खुली नजरसे देखो मित्रो, खोलो मनके द्वार” हे विज्ञानावर आधारित समुहगीत सादर केले. तसेच इ.५ वी ते ७ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांनी “पाणी से ही जीवन है” व इ.८ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी “प्रदुषण हटाओ, पर्यावरण बचावो” हे पर्यावरण संवर्धन संदेश देणारे पथनाट्ये सादर केली.
विज्ञानदिन निमित्ताने इ.१ ली ते ९ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांतर्फे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू व विज्ञान साहित्य यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. सदर प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक वस्तू तयार केल्या होत्या.तसेच विविध वैज्ञानिक प्रयोग साहित्याच्या माध्यमातून दाखविले होते. पालकांनीही प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विज्ञान साहित्य, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू यामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. उपक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सुवर्णा पोतदार यांनी केले. उज्वला जाधव, नरेंद्र वारके व संगिता बिऱ्हाडे यांनी विज्ञान साहित्य व टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंचे परिक्षण केले. कार्यक्रमासाठी शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले.