यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेले दोन लहान बालके पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एक बालकाचा मृतदेह मिळाला असून दुसर्याचा अद्याप शोध युद्ध पातळीवर सुरू आहे.
यावल तालुक्यातील निंबादेवी धरण हे आपल्या निसर्गसौदर्यासाठी खानदेशात प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटकांची वर्दळ असते. सध्या कडाक्याचे उन पडत असल्याने अनेक जण यात पोहण्यासाठी जात असतात. तालुक्यातील सावखेडासीम गावाजवळच्या आदिवासी वस्तीवरील नेनू किसान बारेला ( वय १०) आणि आसाराम शांतीराम बारेला ( वय १४) हे धरणावर काल सायंकाळी आंघोळीसाठी गेले होते.
ही दोन्ही बालके पाण्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. परिणामी दोन्ही जण यात बुडाले. ही माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा शोध सुरू केला. यात आसारामचा मृतदेह आढळून आला असला तरी नेनूचा पत्ता लागला नाही. रात्री उशीरापर्यंत ही शोध मोहिम सुरू होती. या दोन बालकांच्या मृत्यूमुळे यावल तालुक्यात आणि बारेला परिवारावर शोककळा पसरली आहे. पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी माहिती घेतली असून पुढील कार्यवाही करणे सुरू आहे.