बुलढाणा जिल्ह्यात दुर्दैवी घटना
बुलढाणा (प्रतिनिधी) : गोंधळ खेड शिवारात शेती राखण्यासाठी गेलेल्या ३६ वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारी घडली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली.
गिरड येथील रहिवाशी सुनील सुभाष जाधव (वय वर्ष ३६) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. २ भाऊ, आई, वडील, पत्नी, १ मुलगी असा परिवार आहे. गुरुवारी ते दुपारी आपल्या शेतात शेत राखण्यासाठी जात असताना त्याच्यावर अचानक बिबट्याने हल्ला करून त्याला ५० मीटर खोल दरीत घेऊन गेला. त्या बिबट्याने शेतकऱ्याच्या नरडीचा घोट घेतल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच वनविभाग व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे आणला. या घटनेची माहिती बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांना मिळताच त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवगृहात जाऊन पाहणी केली. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाऊन माहिती घेतली.