भुसावळच्या तत्कालीन तुरुंग अधीक्षकासह ४ तुरुंगरक्षक आरोपी !
भुसावळ ( प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील वॉरंटमधील आरोपीला भुसावळ दुय्यम कारागृहात आणल्यानंतर तुरूंग अधीक्षकांसह तुरूंग रक्षकांनी त्यांना बेदम मारहाण केली होती. या घटनेत कैद्याचा मृत्यू झाला होता. आता तब्बल दोन वर्षानंतर भुसावळातील तत्कालीन तुरूंग अधीक्षकांसह चार तुरूंग रक्षकांविरोधात भुसावळ शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर न्यायालयाच्या आदेशानुसार चांगदेव येथील सुनील भागवत तारू (40, चांगदेव, ता.मुक्ताईनगर) यांना 29 फेब्रुवारी 2020 रोजी मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली होती न्यायालयाच्या आदेशानुसार तारू यांना भुसावळ दुय्यम कारागृहात हलवण्यात आले होते. तारू यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर त्यांच्यावर औषधोपचार करणे गरजेचे असताना कारागृहातील तुरूंग रक्षकांनी त्यांना बेदम मारहाण केली डोक्यावर व ढोपरावर हल्ला चढवल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता 4 मार्च 2020 रोजी त्यांना रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता.
सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र शवविच्छेदन अहवालाच्या निष्कर्षानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. 1 ते 4 मार्च 2020 दरम्यान घडलेल्या या घटनेत आता दोन वर्षानंतर भुसावळातील तत्कालीन तुरूंग अधीक्षकांसह चार तुरूंग रक्षकांविरोधात भुसावळ शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
भुसावळ शहर पोलिसात मंगळवारी मयताची पत्नी मंगला सुनील तारू (35, चांगदेव, ता.मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन तुरूंग अधीक्षक नागनाथ महादेव भानोसे, तुरूंग रक्षक व हवालदार सुभाष बाबूराव खरे, हवालदार भानुदास निवृत्ती पोटे, सीताराम विठ्ठल कदम, अनिल श्रीराम बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन पडघण करीत आहेत.
***********
चिन्या जगताप हत्याकांडाची पुनरावृत्ती भुसावळात !
अशाच प्रकारचे जळगाव कारागृहात मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचे चिन्या जगताप हत्याकांड जिल्ह्यात गाजते आहे तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, तुरुंगाधिकारी जितेंद्र माळी, रक्षक अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल करण्यात आला आहे . ४ महिन्यांपूर्वी हा गुन्हा दाखल झालेला असला तरी फरार असलेले हे आरोपी पोलिसांना अद्याप सापडलेले नाहीत ! जिल्हा न्यायालयाने या आरोपींपैकी एकाचा जमीन अर्ज आधीच फेटाळला आहे हे आरोपी सापडत नसल्याने जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जातो आहे .