भुसावळ ( प्रतिनिधी ) – रात्री साडेबारापर्यंत नियम मोडून सुरू असलेला गरबा-दांडिया बंद करण्याची सूचना पोलिसांनी केल्याने तरूणांच्या जमावाने पोलीस ठाणे पेटवून देण्याची धमकी देत कर्मचार्यांना धक्काबुक्की केली तिघांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.
कोरोनाच्या आपत्तीमुळे नवरात्र उत्सवासाठी नियमावली आखून देण्यात आलेली आहे. हनुमान नगरातील पंचवटी ग्रुपच्या तकदीर मंडळासमोर सार्वजनिक जागेवर शुक्रवारी रात्री साडेबारापर्यंत गरबा व दांडिया सुरू होता. फौजदार महाजन व त्यांच्या सहकार्यांनी पदाधिकार्यांना गरबा बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. वरिष्ठांनी सूचना करूनही त्यांनी ऐकले तरी नाहीच पण पोलीस कर्मचार्यांना धक्काबुक्की केली.
ऋषी शुक्ला याच्यासह इतरांनी पोलीस ठाणे पेटवून देण्याची धमकावणी देत धुडगुस घातला. पोलिस उपनिरीक्षक महाजन यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात धीरज राजपूत (रा. हनुमान नगर, ), किरण कलाल (रा.साईबाबा मंदिराजवळ, साईशंकर नगर, ), ऋषी शुक्ला (रा.हनुमान नगर, ) व प्रशांत उर्फ गोलू ठाकूर (रा.भुसावळ) व तीन अनोळखी अशा सात जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला यापैकी धीरज राजपूत, किरण कलाल व ऋषी शुक्ला यांना अटक करण्यात आली इतरांचा शोध सुरू आहे. सपोनि हरीश भोये पुढील तपास करत आहेत.