नाशिक (वृत्तसंस्था) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोल्हापूर निवडणुकीच्या मुद्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ‘जर कोल्हापूरमधून निवडून येणार होतात, तर मेधा कुलकर्णी यांचा अधिकार का डावलला, विधानसभेला त्यांचं तिकीट का कापलं’, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

नाशिकमध्ये आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी चौफेर फटकेबाजी केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, ‘हिंमत असेल तर कोल्हापूरमध्ये पोटनिवडणूक लावा जिंकलो नाही तर हिमालयात जाईल.’ त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत ‘जर कोल्हापूरमधून निवडून येणार होता तर पुण्यात मेधा कुलकर्णी यांचं तिकीट का कापलं? असा सणसणीत टोला भुजबळांनी लगावला.
तसंच, या कार्यक्रमात छगन भुजबळ आणि राज्यपालांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहण्यास मिळाली. ‘राज्यपाल यांनी वारंवार नाशिकला यावं, हवा आणि निसर्ग चांगला आहे. राज्यपालांनी नाशिकला राजभवन बांधावं. या 2 वर्षात सर्व इमारती बांधा, राज्यपाल महोदय यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम होऊन जाऊ देऊ’ असा टोमणा भुजबळांनी राज्यपालांना लगावला. यावर ‘तब तक क्या सिन रहेंगा? अशी कोपरखळी राज्यपालांनी लगावली.
आता राज्यपालांनी कोपरखळी लगावल्यावर ‘हम तब भी आपके साथ ही रहेंगे’ असं म्हणत भुजबळांनी प्रत्युत्तर दिले आणि सभागृहात एकच हश्या पिकली.
‘कोल्हापूरमध्ये हरलो तर हिमालयात जाईल, असं पाटील म्हणत असले तरी आम्ही अशी कोणतीही टीका केली नाही. मुळात ज्यात काही तथ्य नाही. त्यात असं बोलणं योग्य नाही. चंद्रकांतदादा, आम्हाला तुमची गरज आहे, तुम्ही कुठे ही जावू नका, असा खोचक टोला मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.







