मध्यप्रदेशात घटना, जळगाव तालुक्यातील असोद्यात शोककळा
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : दुसऱ्या दिवशी बहिणीचा साखरपुडा असल्याने घरी येत असलेल्या बहिणीला बऱ्हाणपूर येथे घेण्यासाठी नेपानगर येथून कारने निघालेल्या भावाच्या वाहनाचा दि. १५ फेब्रुवारी रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरु असताना तरुणाचा सोमवारी उपचारादरम्यान सकाळी ७ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. ते मूळचे जळगाव तालुक्यातील असोदा येथील असल्याने शोककळा पसरली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.
मुकुल उमेश बऱ्हाटे (वय २४, रा. डाभीयाखेडा जि. नेपानगर, मध्यप्रदेश, मूळ असोदा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो नेपानगर येथे आई, वडील, बहिण यांच्यासह राहत होता. अभियांत्रिकी शाखेत शिक्षण झाल्यावर मुकुल हा पुणे येथे आयटी कंपनीत कामाला होता.(केसीएन)मुकुलचे वडील शेती काम करतात. अनेक वर्षांपासून ते नेपानगर येथेच वसलेले आहे. दरम्यान, मुकुलची बहीण खुशबू हीचा साखरपुडा दि. १६ रोजी असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. त्याकरिता खुशबू हि पुणे येथून बऱ्हाणपूर येथे आली होती. तर तिला घेण्यासाठी नेपानगर येथून मुकुल कारने एकटाच निघाला होता. दि. १५ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास मुकुलचा नेपानगर ते बऱ्हाणपूर दरम्यान भीषण अपघात झाला.
त्याला ग्रामस्थांनी बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. तेथून जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथे मुकुलवर उपचार सुरु होते. दरम्यान, सोमवारी उपचारादरम्यान दि. ३ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मुकुलची प्राणज्योत मालविली.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा एकच आक्रोश केला. मुकुलचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता. घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.