अमळनेर तालुक्यातील म्हसले येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यातील म्हसले येथील एका शेतकऱ्याला पायी जात असताना अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात शेतकरी गंभीर जखमी झाला होता. बुधवारी दि. ३१ जुलै रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशनला करण्याचे काम सुरू होते.
गुलाब तुकाराम पाटील (वय ५५, रा. म्हसले ता. अमळनेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गावामध्ये आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी यांच्यासह राहत होते. शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. (केसीएन)मंगळवारी दि. ३० जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास म्हसले गावाजवळ शेताकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोरात धडक दिली. या धडकेत ते जबर जखमी झाले होते. त्यांना तातडीने ग्रामस्थांनी व कुटुंबीयांनी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
तेथून बुधवारी दि.३१ जुलै रोजी दुपारी दीड वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारदरम्यान संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांना वैद्यकीय पथकाने मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकाच आक्रोश केला. सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशनला करण्याचे काम सुरू होते.(केसीएन)दरम्यान धडक देणारे अज्ञात वाहन कोणते हा आता पोलीस तपासचा भाग आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे अमळनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.