जळगाव ( प्रतिनिधी ) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जोपर्यंत श्रीमंत-गरीबांना आवश्यक स्वदेशी वस्त्र मिळत नाही तोपर्यंत मी केवळ पंचा नेसेल या प्रतिज्ञेला २२ सप्टेंबररोजी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. महात्मा गांधी यांच्या वस्त्रत्याग शताब्दीनिमित्त गांधी रिसर्च फाउण्डेशनद्वारा ‘आज गांधी आठवतांना…!’ या विषयावर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशातील गरीब जनतेला नेसायला पुरेसे वस्त्रही मिळत नाही आपण मात्र पूर्ण वस्त्रानिशी वावरतो. याबाबीचे गांधीजींना खूप वैशम्य वाटत असे. त्यांचे संवेदनशील मन व्यथित झाले.‘जोपर्यंत गरीबांना आवश्यक वस्त्र मिळत नाही तोपर्यंत फक्त पंचा नेसेल व इतर वस्त्रांचा त्याग करीन…’ ही प्रतिज्ञा त्यांनी २२ सप्टेंबर १९२१ रोजी मदुराई येथे केली. त्या दिवसापासून गांधीजी आजीवन फक्त पंचा नेसून राहिले. महात्मा गांधीजींच्या अनुयायांनी देखील जास्त वस्त्र संग्रह न करता गरजेपुरते वस्त्र वापरण्याचा संकल्प घेतला. गांधीजींच्या या कृतीची प्रेरणा इतरांनादेखील मिळाली
महात्मा गांधींच्या या वस्त्रत्यागाच्या शताब्दी वर्षाच्या औचित्याने व ‘त्याग करण्यात नेहमीच स्वात्विक आनंद प्राप्त होतो’ या गांधीजींच्या वचनाचे स्मरण करुन आपल्यातील वाईट सवयी, व्यसन यांचा त्याग करण्याचा संकल्प करण्यासाठी गांधी रिसर्च फाउण्डेशनद्वारा ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. २२ सप्टेंबरला दुपारी ४.०० वाजता ऑनलाईन कार्यक्रमात फेसबुक (https://www.facebook.com/gandhiteerth/) व युट्यूब लिंकद्वारे (https://www.youtube.com/c/GandhiTeerth) सर्वांना सहभागी होता येईल. व्याख्यानानंतर प्रश्नोंत्तरे होतील. जास्तीत जास्त संख्येने लिंकवर क्लिक करुन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक गांधी रिसर्च फाउण्डेशनद्वारा करण्यात आले आहे.