जळगाव (प्रतिनिधी) – भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या विविध मंचावर अदानीला पाठिंबा देण्याचे काम करीत आहे. एअरपोर्ट, माध्यम समूह व विविध संस्था ज्यांमध्ये प्रॉफिट आहे , त्यांवर धाडी टाकून त्या नंतर अदानी समूहाकडे वळवायचे असे कारभार मोदी सरकार करीत आहे. ज्या दिवशी भाजप सत्तेतून जाईल तेव्हा हा देश भ्रष्टाचारातून मुक्त होईल. भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये घ्यायचे अन्यथा त्यांच्यामागे चौकशा लावून जेलमध्ये टाकायचे असा कार्यक्रम भाजप राबवित आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय लाखे पाटील यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत मोदी सरकारवर केला. आगामी काळात काँग्रेस पक्ष आणि देशातील सर्व विरोधी पक्षांतर्फे निषेध मोर्चे, रॅली काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. लाखे पाटील पुढे म्हणाले की, राहुल गांधी लोकसभेत जाऊ नये, त्यांनी प्रश्न विचारू नये म्हणून नियोजन केले गेले. ज्या व्यक्तीला खटला चालवायचा नव्हता, तो खटला अचानक सुरु झाला. तसेच सुरत कोर्टातील न्यायाधीशांची बदली करून नवीन न्यायाधीश आणले गेले. ज्या प्रकरणात कुठलेच युक्तिवाद न होता थेट अपात्र होण्यासाठी असणारी २ वर्षांची शिक्षा झाली. पुढील २४ तासांत त्यांचे सदस्यत्व देखील रद्द करण्यात आले. अदानी समूहाविषयी प्रश्न विचारू नये म्हणून राहुल गांधी यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
देशातील मोठी संपत्ती नियमांत बसत नसतानाही मोदी सरकारकडून अदानी समूहाच्या नावावर करण्यात आली. अनेक सरकारी संस्थांचे पैसे अदानी समूहाकडे वळते करण्यात आले. मोदी सरकारने ४ लाख प्रायव्हेट कंपन्या बेनामी कंपन्या करून टाकल्या. त्यांना कुठलीही नोटीस देण्यात आलेली नाही. या सर्व मुद्द्यांवर राहुल गांधी लोकसभेत बोलणार होते व ते जनतेला कळू नये म्हणून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा प्रक्षेपण बंद करण्यात आले. तसेच, मोदी व अदानी यांचे सर्व संबंध बाहेर आले असते म्हणून राहुल गांधी यांना अडविण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, अशा शब्दात डॉ. संजय लाखे पाटील यांनी मोदी सरकारवर आरोप केले.
देशातील अदानी समूहाची चौकशी झाली पाहिजे. सेबी अदानीविषयी उत्तरे देत नाही. ईडीला अदानींची चौकशी करू द्यायची नाही. सर्वोच्च न्यायालयात अदानी समूहाविषयीची प्रकरणे येऊ द्यायचे नाही. म्हणून मोदी सरकार प्रयत्न करीत आहे. मोदी सरकार देशातील पैसे वेगवेगळ्या मार्गाने अदानी समूहात वर्ग करीत आहेत, असेही डॉ. लाखे पाटील म्हणाले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय लाखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, जळगाव तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, शहराध्यक्ष शाम तायडे, युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, उदय पाटील, मुजीब पटेल आदी उपस्थित होते.