यावल तालुक्यात मोहराळा येथील घटना, संतप्त जमावाकडून कारची तोडफोड
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मोहराळा गावात गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह शुक्रवारी एका शेतातील विहिरीत आढळून आला. त्याच्या अंगावर जखमांच्या खुणा असल्याने खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात मोठा तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावाने एका चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याने वातावरणात तणाव असून परिस्थिती आता नियंत्रणात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
साहिल शब्बीर तडवी (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, १ भाऊ, २ बहीण असा परिवार आहे. हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह चालतो. (केसीएन) दरम्यान, साहिल हा दि. १६ जूनपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला होता, मात्र त्याचा थांगपत्ता न लागल्याने यावल पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. अखेर शुक्रवारी दि. २० रोजी दुपारी साडेतीन वाजता रेवा चौधरी यांचे शेतात विहिरीत साहिलचा मृतदेह मोहराळा गावाजवळील वड्रीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या शेतातील विहिरीत आढळून आला. याची माहिती गावात पसरताच ग्रामस्थ घटनास्थळी आले. त्यांनी गावातील एका कुटुंबावर घातपाताचा संशय व्यक्त करत त्यांच्या घराबाहेरील चारचाकी वाहनाची तोडफोड केली. जमावाच्या या आक्रमकतेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची गंभीरता ओळखून पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, हवालदार वासुदेव मराठे, सुनील पाटील आणि अमित तडवी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेनंतर मोहराळा गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, हवालदार नीलेश चौधरी, मोहन तायडे, अल्लाउद्दीन तडवी, भरत कोळी आणि सागर कोळी यांच्यासह अतिरिक्त कर्मचारी गावात गस्त घालत आहेत. (केसीएन)मृत साहिलच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदन इन कॅमेरा पद्धतीने करण्याची मागणी केली. पोलिसांनी मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालय येथून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. येथे शनिवारी शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी तपासासाठी काही जणांना ताब्यात घेतले असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.