भुसावळ तालुक्यातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील हतनूर गावाजवळ वरणगाव पोलीसांनी नाकाबंदी करीत असताना, सावदा येथून वरणगाव मार्गे जाणाऱ्या एका आयशर ट्रकवर कारवाई केली आहे. त्यातून तपासणी करून बारा उंटांना ताब्यात घेत तीन संशयित आरोपींना बुधवारी रात्री अटक करण्यात आली. एका उंटाचा मृत्यू झालेला आहे.
तालुक्यातील हतनुर गावाजवळ बुधवार दि. २१ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सहा. पोलीस निरिक्षक आशिष आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली, पोहेकॉ प्रविण युवराज पाटील व पोहेकॉ नागेंद्र तायडे हे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते. तेव्हा सावदा मार्गे वरणगावकडे येणारी आयशर ट्रक क्र. (सी जी ०४ एन.एस २००५) जात असताना अडविले.
वाहनाची तपासणी केली असता त्यात अमानवी पद्धतीने तांबडसर रंगाचे भारतीय वंशाचे बारा उंट अंदाजे चार ते पाच वर्षाचे जिवंत आढळले. याबाबत वाहन चालक व त्याच्या साथीदारांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. चालक संतोषकुमार भगीरथ वर्मा (वय ५३, रा. पडणा जि राजगड,म.प्र), मुकेश गुरुमूख नायर (वय ५०, रा. कुमटी हसलपुर जि इंदौर), कार्तीक कैलास वर्मा (क्लिनर) (वय २५, रा. गिदोरी राजगड, म.प्र) यांनी सदरचे उंट हे जावरा जि रतलाम (म.प्र) येथुन मालेगाव येथे घेऊन जात असल्याची माहिती दिली.
कारवाईत, १७ लाख ३० हजार रुपायाचे बारा उंट व आयशर वाहनासह ताब्यात घेऊन तिघांना अटक करण्यात आली आहे. वरणगाव पोलीस स्टेशनला पोहेकॉ प्रविण पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उप निरिक्षक इस्माईल शेख हे करीत आहे.