डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांचे कौशल्यपूर्ण यश
जळगाव(प्रतिनिधी) :- ११० किलो वजन असलेल्या आणि बीएमआय ४४ असलेल्या एका महिलेला यशस्वी आणि सुरक्षित प्रसूती करून देण्यात डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
बर्हाणपूर येथील हसरत शेख ( वय २८) या महिलेची ही दुसरी प्रसूती होती, ती देखील तब्बल नऊ वर्षांनंतर. यावेळी तिचे वजन अत्यधिक वाढलेले होते आणि रक्तदाबही नियंत्रणाबाहेर गेला होता. त्यामुळे ही एक उच्चजोखमीची (हाय-रिस्क) केस मानली जात होती. महिला आणि बाळाचे प्राण वाचवणे हेच प्राथमिक उद्दिष्ट होते.रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिला विशेष निगराणीखाली ठेवण्यात आले. नियमित तपासण्या, आवश्यक रक्ततपासण्या आणि सोनोग्राफीच्या माध्यमातून संपूर्ण स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले.
आव्हान यशस्वी ठरले
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञांनी योग्य नियोजन, तांत्रिक कौशल्य,अनुभवी टीमच्या सहकार्याने प्रसूतीची आखणी केली. महिलेच्या वाढलेल्या बीएमआय सोबतच तिचा वाढलेला रक्तदाब ही अतिशय चिंतेची बाब होती. कोणत्याही क्षणी स्थिती बिघडण्याची शक्यता होती. अशा वेळी विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. करूणेश गुप्ता, डॉ. तेजस सोनवणे, डॉ. मृदुला मुंगसे, डॉ. पल्लवी शेंडगे यांच्या टीमने अत्यंत दक्षता बाळगून, वेळेची अचूक निवड करून शस्त्रक्रियेच्या (सीझेरियन) मार्गाने सुरक्षित प्रसूती केली. या प्रक्रियेत बाळ पूर्णपणे निरोगी असून आईची तब्येतही स्थिर आहे.
बाळंतपणानंतरच्या काळातही महिला विशेष निगराणीखाली होती. यशस्वी प्रसूतीमुळे महिला, तिच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले असून, त्यांनी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
ही केस केवळ वैद्यकीय उपचारांची नव्हे, तर टीमवर्क, नियोजन आणि अनुभवाची कसोटी होती. अशा उच्चजोखमीच्या परिस्थितीत यशस्वी प्रसूती हे आमच्या रुग्णालयाच्या क्षमतेचे द्योतक आहे. या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि समर्पित सेवेमुळे अगदी कठीण परिस्थितीतही मातृत्वाचा आनंद सुरक्षितपणे मिळवता येतो.
– डॉ.मृदुला मुंगसे, निवासी डॉक्टर