पाचोरा (प्रतिनिधी ) – जळगांव स्थानिक गुन्हे शाखेचा पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल संभाजी ब्रिगेड तसेच बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन तर्फे हरिभाऊ तुकाराम पाटील यांच्या लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने वर्ग करण्यात आले आहे. दुसरीकडे अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात बकाले यांच्याविरोधात अशोक चव्हाण यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
हरिभाऊ पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि किरणकुमार बकाल यांनी मराठा समाजाबद्दल अत्यंत अपमानास्पद वक्तव्य केले असून स्त्रियांना लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे हे विधान असून मी मराठा समाजाचा असून बल्लाळेश्वर फाउंडेशनचा संस्थापक असून समाजाचा कार्यकर्ता आहे असे हरिभाऊ पाटील यांनी म्हटले आहे . तर अहमदनगर जिल्ह्यातील छावा संघटनेचे अशोक चव्हाण यांनी तोफखाना पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे बकाले यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.