जळगाव तालुक्यातील वाकडी म्हसावद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शेतात जात असताना अपघात होऊन बैलगाडी पलटी झाली. या बैलगाडीखाली दबून कुटुंबातील १३ वर्षीय मुलाचा डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि. ११ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. तालुक्यातील मु. वाकडी, पो. म्हसावद येथे घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
गौरव आनंदा पाटील (वय १३, रा. मु. वाकडी, पो. म्हसावद, ता. जळगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. तो गावात आई, वडील, काका, १ भाऊ, १ बहीण असा परिवार आहे. त्याचा परिवार शेतीकाम करून उदरनिर्वाह करतो. गौरव पाटील हा थेपडे शाळेत ७ वी इयत्तेत शिकत होता. सोमवारी दि. ११ मार्च रोजी तो शेतात बैलगाडी घेऊन गेला होता. धावता धावता अचानक बांधावर चढून बैलगाडी पलटी झाली. या बैलगाडीखाली गौरव दबला जाऊन त्याच्या डोक्याला जबर मार लागला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्याला उचलून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी आणले.
रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गौरवच्या मृत्युमुळे गावावर शोककळा पसरली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.