नागरिकांची नाराजी
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात दरवर्षीप्रमाणे बहिणाबाई महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे आयोजन बॅरिस्टर निकम चौकात सागर पार्क येथे करण्यात आले आहे. मात्र या महोत्सवात नागरिकांना पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना मैदानभर फिरावे लागत आहे. तसेच, खाद्यपदार्थ स्टॉलजवळ आग लागल्यास कुठलीही अग्निशामक यंत्रणा दिसून आलेली नाही. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत आहेत.
बहिणाबाई महोत्सवात विविध प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत. महोत्सवात ऍड. उज्ज्वल निकम यांच्या घराच्या दिशेने असलेल्या भागात खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल लागलेले आहेत. यात विविध प्रांतातील खाद्यपदार्थ देखील आहेत. काहींनी गरम पदार्थ तयार करण्यासाठी गॅस सिलेंडर व चूल पेटविल्या आहेत. असे असले तरी येथे मात्र सुरक्षेची कुठलीही व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आलेले नाही. अचानक आग लागली तर फायर एस्टीन्ग्यूशर सिलेंडर व इतर सुरक्षा साधने जेथे गॅस सिलेंडर वापरली जात आहेत, त्या ठिकाणी दिसून आलेली नाही. तसेच, अग्निशामक दलाचा बंबदेखील मैदानात उभा नाही. यामुळे जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती नागरिकांनी दिली.
महोत्सव पाहण्यास आलेल्या काही तरुणांनी सांगितले की, दिवसा ऊन असल्याने तहान लागत आहे. महोत्सव फिरून झाल्यावर काही जेष्ठांना पिण्याचे पाणी हवे होते. मात्र त्यांना ते मिळून आलेले नाही. त्यामुळे खाद्य पदार्थांकडे जाऊन तेथून विकत पाणी घ्यावे लागले. महोत्सवात पाच ते सहा ठिकाणी पाण्याची व्यवस्था असायला हवी, अशी प्रतिक्रिया तरुणांनी व्यक्त केली.