जामनेर तालुक्यातील वाघारी येथील घटना, पीडिता राहिली गर्भवती
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाघारी येथील एका आई-वडिलांनी स्वतःच्या मुलीला ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्या आत्याच्या मुलाशी तिचा बालविवाह लावून दिला. त्यानंतर या विवाहसंबंधातून ती गर्भवती राहिल्यानंतर हे बिंग फुटले. पुणे येथील पोलिसाच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला पीडित तरुणीचे आई-वडील, आत्या-मामा व पीडित तरुणीचा पती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणीचा वर्षभरापूर्वी जून २०२२ मध्ये विवाह झाला. त्यावेळी तिचे वय १७ वर्षे ११ महिने होते. पीडित तरुणीचे आई-वडील छायाबाई राजू सरताळे (वय ४०) आणि राजू हरी सरताळे (वय ५०, दोन्ही रा. वाघारी) यांनी तरुणीची आत्या कोकीळाबाई गणेश उदने (वय ४५), मामा गणेश श्याममल उदने (वय ५५, दोन्ही रा.अजिंठा ता.सिल्लोड) यांच्याशी संगनमत करून उदने यांचा मुलगा शंकर गणेश उधने (वय २३) याच्याशी बालविवाह लावून दिला.
त्यानंतर पीडित तरुणी ही वाघारी येथे राहत होती. तेथे तिच्या आत्याच्या मुलाने ती अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही तिच्याशी संबंध ठेवले. त्यानंतर ते पुणे येथील कात्रज परिसरात संतोष नगरात राहायला गेले. त्यांच्या संबंधातून पीडित तरुणीही गर्भवती राहिली. याबाबत भारती हॉस्पिटल, पुणे यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला कळविल्याने ही घटना उघडकीस आली.
त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल रवींद्र ओझय्या चीप्पा (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर काळे हे करीत आहेत.